जिवती :-जिवती तालुक्यातील काकबन येथील एका आदिवासी तरूण शेतकऱ्यांने सततच्या नापिकीला व कर्जाला कंटाळून विषारी किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. माणिक उर्फ मोकिंद सुभाष सिडाम (वय २२) असे मृत्य आदिवासी तरूण शेतकऱ्याचे नाव आहे.
वडिल वयोवृध्द झाल्यानंतर मृत्यक माणिक सिडाम हा संपूर्ण कुटुंबाचे पालनपोषन शेतीच्या भरोश्यावर करायचा, वडिलाकडे असलेल्या जमिनीवर त्यांने कापुस, ज्वारी, सोयाबीन पिक घेऊन संसार चालवायचा मात्र मागिल अनेक वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे कर्ज काढून केलेल्या शेतात नापिकी होऊ लागली. यंदाही कर्ज काढून शेती केली मात्र सततच्या पावसामुळे शेतातील पिके तग धरली नाही. यंदाही नापिकी झाल्यास अंगावरील कर्ज फेडायचे कसे व वयोवृध्द आईवडिलाचा सांभाळ करायचा कसा या चिंतेत तो नेहमी राहायचा. घटनेच्या दिवशी माणिक शेतातील कापसाची फवारणी करतो, म्हणून शेतात गेला अन् तिथेच माणिकने विषारी किटकनाशक प्राशन करून अखेरचा श्वास घेतला. जमिन वडिलांच्या नावाने असतानाही मृत्यक माणिक हा कुटुंब प्रमुख म्हणून तो संपूर्ण आर्थिक व्यवहार करायचा. वडिलांच्या नावाने त्याने बँक व खाजगी कर्जही घेतल्याची माहिती आहे. त्याच्या जाण्याने कुटुंबावर संकट कोसळले आहे. त्याच्यामागे वयोवृध्द आईवडिल, दोन बहिणी, भाऊ असा बराच मोठा आप्तपरिवार असून तात्काळ त्या कुटुंबियांना दुखःतून सावरण्यासाठी आर्थिक मदत द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment