भद्रावती: देशभक्तीपर प्रसंग मग तो कोणताही असो. त्यामुळे कळत नकळत स्फुरण चढते. धडधडत्या छातीच्या युवा मनातलं सळसळत रक्त पेटून उठते. देशाच्या प्रती काहीतरी करण्याची प्रेरणा प्राप्त होते. युवकांमधला खरा युवक जागृत होतो. याचाच प्रत्यय भद्रावतीत सळसळत्या रक्ताच्या युवकांनी आयोजित केलेल्या 100 मीटर लांबीच्या तिरंगा रॅलीत पाहायला मिळाला . या रॅलीच्या आयोजनाची मुख्य संकल्पना नकुल प्रशांत शिंदे यांची होती. रॅलीच्या आयोजनात नकुल शिंदे ,रोहन कुटेमाटे ,भुमेश वालदे, संजय बॅनर्जी ,शुभम शिंदे ,अनिरुद्ध डंबारे ,केतन तिडके, प्रज्वल नामोजवार, गणेश पारधे, शुभम कटारे, शिवा पांढरे ,मनोज पापडे, तेजस कुंभारे ,रोहन कटारे, शंतनु शिंदे ,अमोल रोडे व अन्य युवकांचा समावेश होता .
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरातील मुख्य मार्गावरून 15 ऑगस्ट ला १०० मीटर लांबीची तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅली दरम्यान शहरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींच्या पुतळ्यांना माल्यार्पण करण्यात आले.
मुख्य म्हणजे 100 मीटर लांबीच्या या तिरंगा रॅलीचे नेतृत्व सळसळत्या तरुणाईने केले होते. तथा शहरातील विविध राजकीय , सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी, व्यापारी, विद्यार्थी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशभक्तीपर आधारित विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. स्वातंत्र्य दिन चिरायू होवो, ही भावना घेवून देशातील शेवटच्या व्यक्ती पर्यंत खरे संविधानरुपी स्वातंत्र्य पोहोचावे ही प्रार्थना करण्यात आली. शहरातील सामाजिक सौहार्द व शांतता कायम राहावी. तिरस्कार, घृणा, आकस, लोभ व धमकी या विरोधात प्रेम, आपुलकी, जिव्हाळा व क्षमाभाव नांदावा, असे सुर रॅलीतून निघाले.
सकाळी दहा वाजता 100 मीटर लांबीच्या तिरंगा रॅलीला शिंदे पेट्रोल पंप भद्रावती पासून सुरुवात झाली. शिंदे पेट्रोल पंप ते जंगल नाका, गांधी चौक, नाग मंदिर चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गाने रॅली काढण्यात आली. रॅली नंतर लगेच आंबेडकर चौक येथे देशभक्तीपर गीतांच्या गायनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर उपस्थित सर्वांना लाडू वाटप करण्यात आले. पाऊस चालू असूनही रॅली मध्ये भद्रावतीकरांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. शेवटी राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.
0 comments:
Post a Comment